दिवस सरला आता संध्याछायेत जगणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे...
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे...
संसारासाठी सारी उमेद खर्चून झाली,
लेकरांच्या सुखासाठी स्वप्नेही गहाण गेली,
आता उरल्या आठवणींच्या सावल्या सोबतीने,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....
जिना जो चढायचा कधी दोन पायऱ्या एका दमात,
आता लागतो आधाराला कोणाचा तरी हात,
सलते आता थरथरत्या हातांना कोणाचाच आधार नसणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....
भरले होते घर कधी आपल्या माणसांनी,
अंगण दुमदुमत होते लेकरांच्या आवाजाने,
आता उरले भिंतींशी दिवसभर बोलत बसणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....
तक्रार नाही तुझ्याशी, भरभरून दिलेस सारे,
डोक्यावर छप्पर, प्रेमळ नाती, दिवस सुखाचे न्यारे,
आता ओढ पैलतीराची, नको एकाकी जगणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....
------ विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment