गोठलेल्या मनामध्ये ना कसली जाणीव,
कळते ना मनास या कसली उणीव...
ना सुखावते मन जरी दरवळ मोगऱ्याचा,
ना बोचतो मनास आता दुरावा कुणाचा,
हरवलेल्या भावनांना शोधतोय जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...
बोलायचे बरेच काही परी शांत मी रहातो,
चेहऱ्यामागील मुखवटे शांत बसून वाचतो,
नात्यांमधील बंध केंव्हाच झाले सुकून निर्जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...
आठवणींचे ढग कधी दाटून येतात,
साचतो पावसाळा इवल्याशा डोळ्यात,
अश्रू वाहतात परी ना तुटतो हा जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...
रात्र रात्र मी जागतो वेळ सरतच नाही,
ही तळमळ कशाची काही कळतच नाही,
मन होईल ते शांत जीवा भेटता तो शिव,
मग राहील ना कसली जाणीव - उणीव...
----विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment