वेगळं सांगायलाच नको, घामाघूम झालेला,
गर्दीतून वाट काढत त्याने बाकडं गाठलं ,
कटिंग घेऊन तिच्या येण्याची वाट पाहू लागला,
पुढच्याच ट्रेन ने आली ती, फलाटावर उतरली,
त्या गर्दीतही सुगंधी झुळूक त्याला स्पर्शून गेली,
गर्दीतून वाट काढत तिनेही बाकडं गाठलं,
दुकानदाराने सवयीने एक चिक्की सरकवली,
भेट झाली, चिक्की संपली, तास सहज निघून गेला,
निघायची वेळ येताच शेवटी तिने प्रश्न केला,
"तू बदलापूर, मी बदलापूर,
असं ठाण्याला किती दिवस भेटायचं,
आपलं हे नातं आता पुढे कधी सरकायचं?"
चेहरा पडला बिचाऱ्याचा, शांत होऊन तो उत्तराला,
डॉक्टर म्हणालेत म्हातारीकडे एकच महिना शिल्लक राहिला,
डोळ्यात टचकन पाणी आलं, जाणीव तिला परिस्थितीची,
घरात फक्त जागा होती, चौघांपूरती रहाण्याची,
तो हळूच शांत होऊन डब्याकडे वळला,
आज एक वर्ष सरलं, दोघे नेहमीप्रमाणे तिथेच भेटले,
तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते, त्यानेच प्रेमाने घातलेले,
चिक्की झाली, कटिंग झाला, तेवढाच गर्दीत एकांत मिळाला,
दोघे निघाले घरी, उद्या पुन्हा एकांतात भेटायला...
---- विभव जोगळेकर