सूर्यकिरणांनी उजळला वाळूचा पसारा,
खेळ संथ लाटांचा भासे स्वगत समुद्राचे,
वाऱ्यासंगे हरवते भान या देहाचे...
क्षितिजाच्या पल्याड मावळतो दिनकर,
सोनेरी किरणांनी सजला नभाचा दरबार
सावल्यांच्या रेषांमध्ये विरते हे जग सारे,
क्षणैक थांबावे वाटे मना चित्र टिपाया हे सारे,
पावलांचे ठसे माझे अलगद मिटवती त्या लाटा,
जणू सांगती क्षणभंगूर आहेत आयुष्याच्या वाटा,
शांततेच्या गाभाऱ्यात दडले किती ते बोलणे,
निःशब्द त्या सायंकाळी चालती लाटांशी संभाषणे,
ना गर्दीचा गोंधळ ना शब्दांचा पसारा
माझ्या सोबतीला इथे अथांग किनारा,
मनाच्या शांत तळाशी उमटती जुनी वादळे,
स्मृतींच्या त्या मार्जनाने ताण मनाचा निवळे,
आकाशात मग पहिला तारा अलगद चमकून जातो,
आठवण घराची मज हळूच तो करून देतो,
निरोप घेता डोळ्यात भाव दाटे विरहाचे,
वाऱ्यासंगे हरवते पुन्हा भान या देहाचे...
----- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment