कृष्णाकाठी सांज उतरली रंग उधळुनी नभामध्ये,
मन नकळत हरवून गेले त्या शांततेच्या गर्भामध्ये..
संथ वाहते कृष्णामाई घेऊन युगांची कहाणी,
लाटांमधुनी ऐकू येते स्वामींची दिव्य वाणी..
हा तो घाट, ही ती भूमी, तपश्चर्येने पावन झालेली,
बारा वर्षे स्वामींच्या साधनेने धन्य केलेली..
वृक्ष, वेली, कणाकणामध्ये, अजुनी त्यांची चाहूल आहे,
वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत दत्तनामाची भूल आहे...
दत्तप्रभूंची राजधानी स्वामींची तपोभूमी महान,
जिथे मिटती वादळे मनाची, आणि लाभे आत्मिक समाधान...
संधिप्रकाशी त्या नभाखाली अंतर्मुख हे मन होते,
स्वतःस शोधत शोधत जाता, स्वामींच्या चरणी रमते...
जन्मोजन्मी लाभो सेवा त्या पावन पादुकांची,
श्वासागणिक ओढ लागो, श्रीगुरूंच्या स्मरणाची।
दत्तप्रभूंची राजधानी नरसोबाची वाडी रे,
नित्य स्मरण पादुकांचे आणि मन गुरुचरणी लीन रे,
कृष्णातीरी दे विसावा पादुकांच्या छायेत,
शेवटचा हा श्वास जावो, फक्त स्वामींच्या नामात....🙏🙏
----- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment