कुठे चालला आहे समाज आपला,
कसल्या दलदलीत जगतोय आपण,
जिथे चिमुरडीवरच्या अत्याचाराचं,
केलं जात आहे राजकारण....
एवढासा जीव, बालपण निरागस होतं,
स्वप्नांच्या पंखांना, अजून उडायचं होतं,
आई - वडिलांच्या कुशीत इवलसं,
सुरक्षित तिचं आयुष्यं सुरू होतं...
एका नराधमाच्या काळया सावलीनं,
फूल उमलायच्या आधीच चिरडलं,
वासनाधुंद नराधमाच्या क्रौर्याने आज,
जणू माणुसकीलाच विटाळलं...
रडतंय आभाळ आज, थरथरतंय मन,
या धर्तीवर मात्र वेगळंच सुरू आहे रण,
त्या नराधमाची, त्या चिमुरडीची जात,
आणि त्यावरून सुरू आहे इथे रणकंदन...
कोण कोणाचा, कुठल्या जातीचा,
यातच अडकून पडलोय आपण सारे,
एक निरागस जीव हरपला तरी ही,
वादाच्या ज्वाळेत जळतंय न्यायचं द्वार हे...
का नाही उभे रहात आपण,
त्या राक्षसाला शिक्षा व्हावी म्हणून?
का अजून एकत्र नाही येत आपण,
चिमुकल्यांच जग सुरक्षित व्हावं म्हणून?
ना फक्त शोक, ना फक्त शब्द,
कृतीतून दाखवू संताप आपला,
चिमुरड्यांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी,
उभारुया सुरक्षित समाज आपला...
एक वचन घेऊ आपण सारे,
ना जातीची ना धर्माची होईल भिंत,
जेंव्हा प्रश्न येईल आपल्या मुलांच्या सुरक्षेचा,
तेंव्हा एकच ओळख, आपण भारतीय इतकंच निश्चित....🙏🙏
------ विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment