तुमच्याशी बोलणे होऊन वर्ष आता उलटले,
अजूनही ते क्षण शेवटचे, तसेच मनात कोरलेले,
आता फक्त आठवणीतले क्षण तेवढे जपलेले...
जन्मलो तेंव्हा कदाचित बोट असेल धरले मी तुमचे ,
शेवटी मात्र माझे हात घट्ट पकडून होते हात तुमचे,
नियतीचे संकेत होते, आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्याचे
मन मात्र तयार नव्हतं, हे सत्य स्वीकारण्याचे,
तो स्पर्श, ते क्षण माझ्या मनात असे कोरले,
आता फक्त आठवणीतले क्षण तेवढे जपलेले...
अजूनही निघता कुठल्या प्रवासा आठवण तुमची येते,
"निघतोय, पोचलो की कळवतो" सांगाया कोणी नसते,
पोकळी ती ह्या मनाला व्यापून असे टाकते,
डोळ्यात मग दुःख सारे दाटूनी असे येते,
ते बोलणे, ते आशीर्वाचन सारे आता संपले,
आता फक्त आठवणीतले क्षण तेवढे जपलेले...
रितेपण आले असे, आभाळाएवढी पोकळी,
आता राहिली शिल्लक आठवणीने भरलेली झोळी,
जडस्वरूप नाहीत तरी हक्काने मी मागतो,
तुम्ही दाविल्या मार्गावर चालण्या आशीर्वाद मागतो...
No comments:
Post a Comment