साद घालतो कुणी भूतकाळातूनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी,
नभी दाटून येती कृष्ण मेघ तशा,
दाटून येती आठवणी,
मन धावते, शोधते, रमते का,
क्षण ना येती ते परतुनी,
काय ओढ ही, का वेदना,
युग लोटले तुला जाऊनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी,
अजूनही जुन्या कोऱ्या वहीत,
पहिल्या पानावर तुझी लेखणी,
त्या लेखणीत दडल्या आहेत,
तुझ्यासंगे अनेक आठवणी,
विसरून गेलो म्हणता म्हणता,
आठवण येते अचानक कुठुनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी,
अजूनही जेव्हा पाऊस येतो,
मन नकळत जाते तिथेच,
मिटल्या डोळ्याआड अचानक,
जुने दिवस दिसतात तसेच,
वर्तमानात असे बेसावध,
क्षण येती जुने परतुनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी...
---- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment