Sunday, August 16, 2026

समुद्र

आज पुन्हा एकमेकांसमोर, उभे ठाकलो आम्ही,
तो अस्वस्थ बेचैन, तितकाच शांत नि स्थिर मी,

लाटांचा गाज, भरतीचा जोर, तो एकटाच गर्जत होता,
अथांग विशाल सागर जणू उग्र, संतापलेला होता,
त्याची व्यथा ऐकण्या, काही पाऊलखुणा, शिंपले नी मी,
तो अस्वस्थ बेचैन, तितकाच शांत नि स्थिर मी,

त्याची गाज ऐकता ऐकता, मी ही मग बोलता झालो,
वरवर शांत भासणाऱ्या मनातील एक एक कप्पे उघडता झालो,
आता सूर्य अस्ताला गेला, राहिल्या काही पाऊलखुणा, शिंपले नी मी,
तो अस्वस्थ, बेचैन, तितकाचं अस्वस्थ, बेचैन मी,

शेवटी रिते झाले मन, निरोपाची वेळ आली,
निरोप देण्या एक लाट हलकेच स्पर्शून गेली,
किनारी राहिल्या काही पाऊलखुणा, शिंपले, घरी परतलो मी,
तो शांत, स्थिर, आता किंचित शांत मी...


----- विभव जोगळेकर

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...