तव चरणावीण मन गुंते सर्वाठायी...
क्षणैक आयुष्य क्षणभंगूर ते सुख,
सुख नांदता घरात दारी उभे दुःख,
कळते हे सर्व परी वळतच नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...
मनी येताच विचार तैसे कर्म घडणार,
कर्माचे फळ मग भोगावे लागणार,
तव नामावीण मनास या लगाम नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...
सर्व दुःखाचे मूळ मनातील विचार,
जेथे मनावर ताबा तेच सुखाचे आगर,
मन साधने गुंतावे यापरी सोपा उपाय नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...
मनाचे हे गुण रामदास वर्णियेले,
दासबोध नि श्लोक मनाचे रचीयेले,
परी आम्हा अभ्यासाची बुद्धी होत नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...
---- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment