Saturday, April 25, 2020

निर्मला काकू ....

निर्मला काकू .... 

काही लोकं अशी असतात जी नेहमी पडद्यामागे काम करत असतात, त्यांच्याबद्दल जास्त कुणी कधी बोलत नाही पण त्यांच काम अविरत चालू असतं. आशा category मध्ये मोडणारी,  जोगळेकरांच्या घरातली अजून एक सून, जिचा ह्या घराच्या उभारणी मध्यें खारीचा वाटा नक्कीच आहे, निर्मला काकू. आज लॉकडाऊन मुळे  घरी बसून होतो, मुलाला दाखवायला म्हणून जुने अलबम काढले आणि त्यात निर्मला काकूंचा फोटो दिसला. मन लगेच भूतकाळात गेलं. मला कळायला लागल्या पासून मी तिला नेहमी एकाच गेटअप मध्ये बघितलंय, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पांढरी नऊवारी साडी, हातात चार काचेच्या बांगड्या. बस्स. पहाटे चार वाजता उठून जे कामाला लागायचं ते रात्री 9/10 वाजता सगळे झोपले की झोपायचं, एवढं तीच routine. अविरत काम करत रहाणं, दिलेल्या घरात मान खाली घालून सतत काम करणं एव्हढच तिला ठाऊक. निदान मी तरी तिला असच पाहिलंय. 

घरात नेहमीची ८-१० माणसं असो किंवा सुट्टीत जमलेली घरातली १७-१८ माणसं, सगळ्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी ललिता काकूला बरोबर घेऊन ती सांभाळायची. काकुला मी कधीच रिकामं बसलेलं बघीतलं नाही की कधी बाहेरच्या पडवीत आलेलं बघितलं नाही. आम्ही सुट्टी संपवून निघालो की मात्र  ती आम्हाला टाटा करायला यायची बाहेर, नाहीतर कायम घरात. स्वयंपाकघर, माजघर, मागची पडवी हे तिचं कार्यालय. तिला ह्या घराची एवढी सवय झाली होती की म्हातारपणी जेंव्हा तिची दृष्टी गेली, तेंव्हा पण ती संपूर्ण घर फिरायची.  तिच्या पायांना जणू सगळं घर पाठ होतं. भिंतीला हात लावत ती  अगदी सहज स्वयंपाकघरातून मागच्या पडवीत यायची. तिथला लाकडी बाकी चुकवून, झोपाळ्याच्या बाजूने, भिंतीला हात लावत कोठाराकडे जायची. कपाट  उघडून जे हवं ते घेऊन परत त्याच मार्गाने स्वयंपाकघरात. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिली. दिसत नव्हतं तरी पण  भाजी चिरून दे, नारळ खवणंण  सतत चालु असायच.

काकुला दोन मुलं आणि तीन मुली पण तिने आमच्या बाबांवर पण आपल्या मुलासारखच प्रेम केलं. वयात अंतर पण तेवढंच होतं. ती विवेक दादाचं (तिच्या स्वत:च्या मुलाचं) नाव घेताना सुद्धा आधी कित्येकदा बाबांचं नाव घ्यायची, विजय, शशी, आनंदा अशी सगळी नाव घेऊन झाली की मग विवेकदादाचं नाव तोंडात यायचं, एवढं निर्मळ मन होतं तिच. आम्ही मे महिन्यात हेदवीला गेलो की निघताना आजी आम्हाला लाह्यांचं पीठ, कुळीथाचं  पीठ आठवणीनं द्यायची. आजी गेल्यानंतर ते काम निर्मला काकू आठवणीनं करायची."तुला लाह्यांचं पीठ आवडतं ना?" अस विचारायचं आणि हातात पिठाची पिशवी टेकवायची. निघायच्या आधी नमस्कार करायला गेलो की तिच्या डोळ्यात पाणी असायचं. "हेदवीला, मला म्हातारीला, विसरू नका, या परत नक्की पुढच्या सुट्टीत" हे म्हणत, पदराने डोळे पुसून, देवासमोरची सुपारी हातावर टेकवायची आणि हातावर दही द्यायची. आपसूकचं आमचे ही डोळ्यात पाणी यायचं. 

आजोबा गेल्या नंतर आजीने घर सावरलं, व्यवहारात लक्ष घातलं . मला वाटतं तिच्या मदतीला जशी Front end ला शालिनी काकू होती मुंबईला, तशी Back end सांभाळायला निर्मला काकू होती.  म्हणूनच कि काय कोणास ठाऊक, या दोघींनी या जगाचा निरोप पण एका पाठोपाठ १० दिवसाच्या अंतराने घेतला. मला कळलेली, माझ्या आठवणीत आहे ती  ही सरळ, साधी, शांत अशी निर्मला काकू, तुझ्यासारखी तूच काकू. तुला शतशः प्रणाम 🙏🙏

..... विभव जोगळेकर 

No comments:

Post a Comment

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...